हिरवा संघर्ष (भाग 6)

 

दिशा सकाळी उठून स्वयंपाकघरात जाते, सासूबाई म्हणतात…

“अगं तू कशाला आलीये? मी खोलीत चहा पाठवला असता की..”

“म्हटलं नाश्त्याचं पाहू जरा…”

असं म्हणतात स्वयंपाकघरातील 2 स्त्रिया हसायला लागतात…
सासूबाई म्हणतात…

“अगं वेडे आपल्याकडे सगळ्या कामांना माणसं आहेत. तुला काय आवडतं ते सांग फक्त…आणि माधव सांगत होता तुला शेती करायचीय म्हणे? कर कर…तुला सगळी मदत करू आम्ही….”

दिशा आश्चर्यचकित होऊन बाहेर पडते…

“श्रीमंतांच्या घरीही इतका थाट नसतो….लोकं का मुली देत नाही शेतकऱ्याला काय माहित…”

दिशा अंगणात जाते…एका बाजूला बांधलेल्या गायी बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज येत असतो…वाऱ्याची मंद झुळूक वाहत असते…शेतात सोडलेल्या पाण्याचा झुळझुळ आवाज येत असतो…

“लोकं निसर्गाची सुंदरता अनुभवायला पैसे भरून फार्म हाऊस वर जातात. इथे तर मला आयतच सगळं मिळालंय…” दिशा मनोमन सुखावून जाते.

सगळं आटोपून दिशा सासूबाईंना सांगते…

“आई…एका मोठ्या कामाला निघतेय मी…माधव ने मला जी जमीन दिली तिथे एकदा जाऊन येते…आशीर्वाद द्या..”

“यशस्वी हो…आणि एकटी जाऊ नकोस…सकू ला घेऊन जा सोबत…”

“सकू??”

“हो..आपल्याकडे कामाला आहे…हुशार आहे पण तितकीच आगाऊ..सकू…ए सकू…”

सकू पदराला हात पुसत बाहेर येते..येता येता पायात आलेल्या दोराला अडखळते…

“अगं हळू….किती तो धसमुसळेपणा…नवीन सुनबाई सोबत जा…आणि येताना परत घेऊन ये आठवणीने..”

“म्हणजे?”

“अगं सकू ची एक अडचण आहे…ती गोष्टी फार लवकर विसरते…”

“अरे देवा..”.

“घाबरू नको…मनाने खूप चांगलीये ती…तुला सगळी मदत करेल ती..”

सकू ला घेऊन दिशा माधव ने तिला दिलेल्या शेतात जाते…सकू ला ती तिथेच उभी राहायला सांगते आणि तिला दिलेल्या जमिनीच्या तुकड्याच्या मधोमध उभी राहते..

सुकलेली जमीन…दूरवर गवताची एक काडी नाही… निष्प्राण झालेली जमीन…कोरडेपणाच्या भेगा अजून मोठया बनत चाललेल्या…. दिशा ने सगळ्या जमिनीकडे एक नजर टाकली…आणि ती गुडघ्यावर खाली बसली…

तिचा स्पर्श जमिनीला होताच वाऱ्याने तिला आलिंगन दिले…वाऱ्याचे मोठे झोत वाहू लागले तसे दिशा चे केस भुरभुरू लागले…

दिशा दोन्ही हातांच्या ओंजळीत माती घेते…आजपासून आपली मोहीम सुरू…ती म्हणू लागते…

“ज्या मातीतून आलोय त्याच मातीची शपथ घेऊन आज अशी प्रतिज्ञा करते की….ज्या भूमीने जगाचं पोषण केलं, तिच्या पुत्राची…भूमीपुत्राची होणारी अवहेलना मी मोडीत काढेन..शेतकऱ्याला त्याचा आत्मसन्मान…प्रतिष्ठा… आणि न्याय मिळवून देईन…समाजाचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेन…शेतीत अशी एक क्रांती करेन की पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतील…”

तिच्या या प्रतिज्ञेचा निसर्गानेही स्वीकार केला…मंद वारा जोरदार गिरक्या घेऊ लागला…आसपासच्या झाडांची पानं फुलं वारा आपल्या ओंजळीत घेऊन दिशावर प्रेमाचा वर्षाव करू लागला….जणू त्या जमिनीत एक प्राण भरला गेला होता…निष्प्राण झालेली जमीन आज आशेने पुन्हा पल्लवित झाली होती…

इतक्यात सकू चा आवाज आला..

“ओ बाई…आमच्या शेतात काय करताय??”

दिशा गोंधळते… मग हळूच हसते… सासूबाई बोललेल्या तिला आठवतात..की सकू विसारभोळी आहे म्हणून…

नंतर दिशा माधवशी बोलते..

“माधव, मला शेतीचा अनुभव नाहीये रे…पण शेतीत काहीतरी क्रांती घडवून आणेल इतला विश्वास आहे मला..”

“ते कसं??”

“मी आपली शेती पहिली….त्यात बघ..तुम्ही 8 वेगवेगळे पिकं घेताय…त्यातले 3-4 किडीने किंवा वातावरणामुळे वाया जातात आणि नुकसान होतं.. पण इतर पिकांच्या व्यापारामुळे ते नुकसान भरून निघतं त्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडत नाही…विचार कर जर सगळीच पिकं निर्यात झाली तर?? ग्राहक आणि शेतकऱ्यांचा डायरेक्ट संबंध आला तर? शेतीत ड्रोन सारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीची पाहणी करण्यात आली तर?”

माधव हसला…

“तू म्हणतेस ते अगदी खरंय…तू लाव बाजी…मी आहे तुझ्यासोबत…तू म्हणशील तसे बदल करू…”

दिशा ला आयुष्याची एक नवीन दिशा मिळते… साधारण आयुष्य जगणं तिला मान्यच नव्हतं.. संघर्षमय जीवनात तिला आनंद शोधायचा होता…आणि इथून सुरवात होते एका वादळाची…हिरवं वादळ…दिशा शेतीत काय काय चमत्कार घडवून आणते पहा पुढील भागात

क्रमशः

Leave a Comment