सार्थक

शाळेतून अचानक असा फोन आला आणि नम्रता घाबरलीच..पहिल्यांदा असा अचानक फोन आला, तेही आकाश च्या शाळेतून…
“काही झालं तर नसेल ना आकाश ला? कुठे पडला तर नसेल ना? काय झालं असेल?”
नको ते विचार मनात यायला लागले…
“काय झालं मॅडम? आकाश ठीक आहे ना? कुठे आहे तो? काय झालं त्याला??”
“रिलॅक्स आकाश ची आई…आकाश ला काहीही झालेलं नाही..आम्ही तुमचं अभिनंदन करायला फोन केला आहे…”
“अभिनंदन?? कशाबद्दल??”
“तुम्ही त्याच्यावर जे संस्कार केलेत ना, त्यामुळे आज अभिमान वाटावा असं काम त्याने केलं…”
नम्रता काळजीच्या शिखरापासून अचानक आनंदाच्या डोहात शिरते…
“म्हणजे? काय केलं त्याने नक्की??”
“वर्गात मुला मुलीचं भांडण झालं…त्यात शर्वरी फार बडबडी मुलगी…तिने मुलांना सुनावलं…आणि एका मुलाला राग आला, त्याने मित्रांना जमा करून शर्वरी ला धडा शिकवू असं सांगितलं, आणि मधल्या सुट्टीत तिला पाठीवर जोरात मारायचं ठरवलं…”
“अरे बापरे… ही मुलं पण ना, कशावरूनही भांडतील…”
“हो…पण तुमचा आकाश त्यांना थांबवायला गेला..सगळ्या मुलांना त्याने हात धरून मागे ओढलं आणि सांगितलं की मुलींमध्ये देवीचा अंश असतो, आपल्या आईमध्ये, बहिनीमध्ये, मैत्रिणीमध्ये सुद्धा असतो…मुलींना कधीच मारायचं नसतं… नाहीतर देवबाप्पा शिक्षा करतो…मुलींशी प्रेमाने बोलायचं असतं.. त्यांचा आदर करायचा असतो…आपल्याला प्रत्येक मुलीत आपली आई किंवा बहीण ओळखता आली पाहिजे… हे ऐकून मुलांनी खरोखर शर्वरी च्या जागी आपली आई आणि बहीण दिसल्याची कल्पना केली आणि ते मागे झाले…आम्ही लपून हे सगळं बघत होतो…आम्हाला आकाश चा इतका अभिमान वाटला…काय सांगू तुम्हाला…खरंच हे तुमचेच संस्कार आहेत..”
नम्रता चे डोळे भरून आले, आकाश ने तिचं आयुष्य सार्थकी लावलं होतं… पण हे सगळं मी तर नव्हतं सांगितलं त्याला…कुणी शिकवलं असेल त्याला इतकं चांगलं?
आकाश संध्याकाळी घरी आला, नम्रता ने आल्या आल्या त्याचे मुके घेतले, त्याच्यावर प्रेमाने हात फिरवला… त्याला आज छान छान खाऊ बनवून दिला, छान खेळणी आणून ठेवली…आज आईला काय झालं? असा विचार ते निरागस मन करत बसलं…इतक्यात बाबा आले आणि आकाश बाबांजवळ बसला..
“बाबा, आज किनई शाळेत…”
आकाश ने सर्व हकीकत सांगितली…
“तुम्ही सांगितलं होतं ना बाबा, मुलींना कधीच त्रास द्यायचा नसतो…मी तेच मुलांना सांगितलं…”
नम्रता ला समजलं, ही सगळी शिकवण आकाश च्या बाबांनी त्याला दिली होती…
“असा नवरा आणि असा मुलगा जर प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात आला तर त्या समाजात स्त्रीची कधीच अवहेलना होणार नाही…देव असं अपत्य आणि असा बाप प्रत्येक घरात जन्माला घालो…”

देवापुढे साखर ठेऊन नम्रता ने मनोमन प्रार्थना केली…


Leave a Comment