रणधुमाळी (भाग 6)

व्हिडीओ संपल्यानंतर सानिका दिसू लागली, ती बोलत होती..

“नमस्कार समाजबांधवांनो…तुम्ही आता पहिलंच असेल की पुतळ्याची विटंबना कुणी आणि का केली असेल…लक्षात घ्या, गणपतराव हे राजकारण मतांसाठी करताय…स्वतःच पुतळ्याची विटंबना करायची, जनतेत संताप निर्माण करायचा… त्याला अजून ठिणगी द्यायची आणि मी तुमचा वाली आहे असा आव आणत मतं मिळवायची…राजकारणात ह्या असल्या व्यक्तीला तुम्ही मत देणार??? आता या व्यक्तीला कायद्याच्या कचाट्यात द्या..मान्य आहे तुमच्या मनात राग उफाळून आलाय, पण गर्दी जास्त आहे…गदारोळ करून आपल्याच माणसांना त्रास होईल..तेव्हा, शांततेत गर्दी निवळायला मदत करा…पुढचं सर्व पोलीस बघून घेतील, कायदा हातात घेऊ नका….”

सानिका एक अघोषित नेता बनली होती जिचं सर्व जनता ऐकत होती..तिचा एकेक शब्द जनतेला मान्य असायचा… केवळ शिकलेली आहे म्हणून नाही, तर तिची सत्याची कास धरणं, कुठल्याही अपेक्षेविना लोकांची मदत करणं आणि गणपतराव सारख्या बलाढ्य राजकारण्यालाही टक्कर देणं…ह्या गोष्टी जनतेला खूप भावल्या होत्या.

जनतेने सानिका ची आज्ञा शिरोधार्य मानून शांतपणे लोकं घरी गेले. पोलिसांनी काही वेळातच गणपतरावांना अटक केली.

गणपतरावांनी ज्या दोन कार्यकर्त्यांनी हे काम केलं त्यांना सांगून ठेवलं होतं,

“यात माझा काहीही सहभाग नाही असं कबूल करा…थोड्या दिवसांनी तुमची मीच जामिनावर सुटका करेन…”

कार्यकर्त्यांनी गणपतरावांनी सांगितल्या प्रमाणे पोलिसांना सांगितलं, गणपतराव निर्दोष आहेत असं सांगून अखेर पोलिसांना त्यांची सुटका करावी लागली.

आता गणपतराव खवळले होते.. त्यांचा संयम सुटला…ते सानिका चा सूड घ्यायला पेटून उठले…

निवडणूक 2 दिवसांवर येऊन ठेपली… आदल्या दिवशी आई सानिका चं दार ठोठावते…

“सानिका.. अगं चहा आणलाय…दार उघड….”

आतून काहीही आवाज येत नाही..

आईला काळजी वाटते, आई अजून जोराने दरवाजा ठोठावायला जाते आणि पाहते तर काय…दरवाजा उघडाच…

“सानिका…सानिका….”

आई घाबरून घरात सगळीकडे शोधते…पण सानिका कुठेही सापडत नाही…

आई सैरभैर होते…हातातला कप गळून पडतो…आईच्या मनात शंकेची पाल चुकचूकते…

“अहो…सानिका…घरात नाहीये…”

“काय?? अगं नीट बघितलंस का?? कुठेय ती??”

सगळीकडे शोधाशोध सुरू होते…एव्हाना गावाला खबर पोचलेली असते..

“मग?? सानिका मॅडम….आता जिरवायची पाळी आपली…लय शानी समजते व्हय स्वतःला….आता कुठं जाशील??”

गणपतराव सानिकाला रात्रीतून तोंडावर औषध मारून बेशुद्ध करून पळवून आणतात…आपल्या गोडाऊन मध्ये तिला ठेवतात…

सानिका च्या तोंडावर पट्टी बांधलेली असते…हात बांधलेले असतात..ती शुद्धीवर येते…हात सोडवायची झटापट करू लागते…समोर बघते तर गणपतराव छद्मी हसत तिच्याकडे पाहत असतात…

सानिका च्या लक्षात येतं की आपलं अपहरण झालंय…

ती नजरेला नजर भिडवून गणपतरावांकडे बघते…गणपतरावांना वाटतं ही झटापट करेल, सुटका करून घेण्यासाठी गयावया करेल..पण सानिका…

मांडी घालून निवांत बसते आणि डोळे मिचकावत गणपतरावांकडे बघते…

गणपतराव चिडतात…तिला बोलायला प्रवृत्त करावं म्हणून तिच्या तोंडावरची पट्टी काढतात…आणि हातही मोकळे करतात…

“काय गं ए….भीती नाही वाटत का….”

सानिका झटापट न करता आरामशीर मागे भिंतीला टेकून बसते…शेजारी एक शेंगांची गोणी दिसते, त्यातल्या फटीतून काही शेंगा बाहेर आलेल्या असतात…

ती एकेक शेंगांची टरफलं फोडून खाऊ लागते….

“काहीही म्हणा गणपतराव.. तुमच्या शेतातला माल म्हणजे माल असतो…”

सानिका चं अपहरण होऊनही तिच्यावर याचा काडीमात्र फरक नाही हे पाहून गणपतराव अजून चवताळून तिच्यावर आरडाओरड करतात, शिवीगाळ करतात…पण सानिका ला जराही भीती वाटत नसते, गणपतराव जितकं बोलायचे तितकी ही अजून मोठ्याने हसायची…

गणपतरावांना फोन येतो तसा ते गोडाऊन ला कुलूप लावून घरी निघून येतात..

घरी आल्यावर बबन भेटतो…

“काय रे बबन्या…आज चेहरा का पडलाय??”

“काही नाही साहेब…मुलीची काळजी…”

“काय झालं तिला?”

“काही झालं नाही…12वी चांगल्या मार्काने पास झालीय…”

“अरे मग चांगलंय की…”

“पुढे इंजिनियर बनायचं म्हणतेय..पण इतका पैसा कुठून आणू? आणि…आमच्या खानदानात कुणीही इतकं शिकलेलं नाही..कसं ऍडमिशन घेतात कुठे घेतात काहीच माहीत नाही…पण पोरगी अडून बसलीय…”

“कशाला शिकायचंय पुढे? काय करणार शिकून? माझ्याकडे आन तिला…माझा डावा हात बनेल ती..कसलीच कमी नसेल तीला…इथे पैसा आहे, दरारा आहे….शिकून काय करेल ती? तुझ्यासारखा माझ्या छत्राखाली वाढू दे तिला…”

“तुझ्यासारखा” म्हटल्यावर बबन च्या डोक्यात एकच कळ उठली…आपण गणपतरावांसाठी पूर्ण आयुष्य वाहून दिलं… त्यात काय मिळालं? गुंड म्हणून ख्याती, लोकांना लुबाडून मिळवलेला पैसा….आणि अपमान.….”

“बबन्या…त्या पोरीकडे जा आणि बघून ये काय करतेय..”
गणपतराव बबन च्या हातात कुलपाची किल्ली देत म्हणतात…

सांगितल्याप्रमाणे सानिका जिथे कोंडून ठेवली होती त्या गोडाऊन मध्ये तो गेला…अर्ध्या तासाने बाहेर आला आणि थेट गणपत रावांकडे गेला….

“आहे ना ती?”

“होय साहेब…”

संध्याकाळी गणपतराव गोडाऊन मध्ये जातात,

“बबन…शिरप्या…इकडे या…पोरगी कुठे गेली??”

बबन आणि शिरप्या दोघेजण घाबरतात…

“साहेब…इथेच तर होती..दुपारी तर भेटलो तिला…”

“हे काय? कुलूप तोडलंय??”

“कोण आलं होतं??”

“मी तर कुलूप लावूनच आलेलो…”

सर्वांची पळापळ सुरू होते…

बबन म्हणतो,

“साहेब, मतदान परवाच आहे, आज आणि उद्या असलं काहीही करायचं नाही ज्याने आपल्या मतांवर परिणाम होईल…”

“अरे बबन्या पण ती…”

“साहेब, ऐका माझं…एकदा का मतदान झालं की मग पाहू तिचा बेत..”

बबन संयमाने घेतो….

“मला पळून जायची गरज नाहीये गणपतराव…”

मागून सानिका येते…

इतका भारदस्त आवाज ऐकून गणपतरावांची भीतीने गाळण उडते…

“कशीकाय सुटलीस?”

“चला, सांगूनच टाकते आता तुम्हाला…”

“काय…”

“आपण अर्ज भरतांना जेव्हा तुमच्या गाडीत बसलो होतो तेव्हा मी मागच्या सीटवर हळूच एक GPS चिप लपवली..ज्याने तुम्ही कुठे जातात, तुमची गाडी कुठे कुठे फिरते याचे सर्व डिटेल्स आम्हाला बसल्या बसल्या समजतात…”

“काय?? अच्छा, म्हणून तुझा पत्ता समजला काय…आणि मी जिथे जिथे सभेला जायचो त्याचंही ठिकाण समजायचं तुला….हुशार आहेस..जीव वाचवलास तू स्वतःचा… पण आता परवा मतदान आहे….माझी चाल मी आता करणार…बघत रहा फक्त…”

सानिका ला आव्हान देऊन गणपतराव निघून जातात.

सानिका सुखरूप घरी पोहोचते…

त्या दिवशी रात्री गणपतराव आपल्या सर्व सहकाऱ्यांना बोलावतात…
(कथा काल्पनिक असल्याने आचारसंहिता वगैरे इथे नाही)

रणधुमाळी (भाग 7)

4 thoughts on “रणधुमाळी (भाग 6)”

Leave a Comment