त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात…

रस्त्याने जात असताना अमित त्याच्या वेगाने चालत होता आणि स्मिता हातात जड पिशव्या उचलत त्याच्या मागे चालत होती.

“भूक लागली आहे, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया…”

समोर असलेल्या रेस्टॉरंट कडे बोट दाखवत स्मिता अमितला म्हणाली…

“इथे?? नको….दुसरीकडे जाऊया..”

बरंच पायी चालवल्यावर एका पत्र्याच्या शेड मधलं वडापाव च्या हॉटेल मध्ये त्याने नेलं..तिथली एकंदरीत अस्वच्छता बघता स्मिताची भूकच मरून गेली, नाईलाजाने अमित समोर ती बसली…

“वेटर… ए…इकडे…ऐकू येत नाही का..दोन वडापाव आण.”

अमित चा कंजूस स्वभाव आणि त्यात दुसऱ्याशी तुसडेपणाने वागण्याचा स्वभाव तिला आठवला…आणि आईचे बोल आठवले…

“अमित चा नाद सोडून दे, चार पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही…तो मुलगा संसार करण्याचा लायकीचा नाहीये…पैसे कमवायची अक्कल तर नाहीच पण माणसांशी कसं वागावं हेसुद्धा त्याला कळत नाही..”

“स्मिता… कुठे हरवलीस??”

अमित चुटकी वाजवून म्हणाला..

“काही नाही..”

“मग खा ना..”

“नको..मला नकोय..”

“मग आधी सांगायचं ना…”

“बाकी, काय म्हणतोस..”

“काही नाही विशेष….आपलं कॅन्टीन आणि घर, याशिवाय दुसरं काही आहे आपल्याकडे..”

“हम्म… मला वाटलं तू पूढे करशील प्रगती…शिक्षण पूर्ण करशील..”

“अरे काय ठेवलंय त्या डिग्रीत…1 वर्षात मोठ्या हॉटेल चा मालक होईल बघ मी..”

“गेले कित्येक वर्षे तू हेच म्हणतोय..”

“अगं बघचं तू…आपला नादच करायचा नाय..नुसता पैशात लोळेल मी..”

स्मिता त्याच्या या हवेतल्या बाता ऐकून चिडली..

“याला काही सांगायलाच नको..”

इतक्यात समर स्मिता ला घ्यायला आला, एका चकचकीत गाडीतून…

“हॅलो…काय मग, झालं का बोलणं दोघांचं…स्मिता सांगत होती तुझ्याबद्दल… खूप जुना मित्र आहेस तू तिचा…म्हटलं घे भेटून तोवर मी माझं ऑफिस चं काम उरकून आलो..”

“काय ऑफिस ऑफिस…आपल्याला नाय जमत बुवा 8 तास दुसऱ्याची चाकरी करायला.आपलं कसं.. आपणच बॉस आणि आपलंच सगळं…”

अमित समर पुढे बढाया मारत होता..

“हो बाबा, तुम्ही ग्रेट लोकं..”

“समर निघायचं आपण??” स्मिता म्हणाली..

“बरं चल निघुया..”

स्मिता समर च्या मागोमाग चारचाकी गाडीत जाऊन बसली…अमित त्याची 2 व्हिलर चालू करत होता पण चालू होत नव्हती, दोन चार शिव्या गाडीला हासडून तो अडकला तिथेच…तोवर स्मिता आणि समर निघूनही गेले..

स्मिता च्या चेहऱ्यावर समाधान होतं..

तिला परत एकदा आईचे बोल आठवले…

“अमित चा नाद सोडून दे, चार पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही…तो मुलगा संसार करण्याचा लायकीचा नाहीये…पैसे कमवायची अक्कल तर नाहीच पण माणसांशी कसं वागावं हेसुद्धा त्याला कळत नाही..”

आई बरोबर बोलत होती, तेव्हा जर तिने मला समर सोबत लग्न करण्याची धमकी दिली नसती तर??? बायकोवर इतका विश्वास असणारा आणि मेहनतीने विश्व निर्माण करणारा समर तिला भेटला असता??? तेव्हा आईला विरोध करून अमित सोबत पळून गेले असते तर?? आज काय नरकवास भोगला असता मी??

म्हणूनच…आजच्या पिढीला हे समजावं…आई वडिलांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात, त्यांचं ऐकण्यातच भलं असतं…

Leave a Comment