प्रसाद – 3 अंतिम

 “नाहीतर काय आई बाबा…काय केलं तुम्ही माझ्यासाठी आजवर? ना मोठा वाढदिवस साजरा केला माझा, ना लांब फिरायला नेलं, ना कसले लाड केले…मी एखाद्या दुसऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्मलो असतो तर किती बरं झालं असतं..”

आईच्या अश्रुधारा वाहायला लागल्या, 

वडील पुढे आले आणि त्याला जोरात कानाखाली मारली…

“नालायका..तुझं संगोपन नीट व्हावं म्हणून दुसरं मूल होऊ दिलं नाही आम्ही…तुला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी ओव्हरटाईम करत गेलो…तुझी आई वर्षातून एकदाच साडी घ्यायची तीही स्वस्तातली…काटकसर करून तुझ्यासाठी एकेक पै जमवत गेलो…एकदा तुझ्या वाढदिवसाला पेढे आणायला पैसे नव्हते तेव्हा तुझ्या आईने रात्रभर जागून चिवड्यांची मोठी ऑर्डर पूर्ण केली अन तुझ्यासाठी पेढे आणले…आणि आज हे पांग फेडलेस आमचे?”

ओम शांत झाला, हळूच म्हणाला…

“मग आई मला सांग, देव सुद्धा तुझ्याबाबतीत हेच म्हणत असेल ना?”

आई ओमकडे बघू लागली…

“म्हणजे?”

“जसं तुम्ही मला इतकं सगळं दिलं आहे, तसंच देवानेही तुला खूप काही दिलं आहे…घर, अंगावर कपडे, सुखसोयी, जीवाला जीव देणारी माणसं…

मग तू जर प्रत्येक गोष्टीत तक्रार करत गेलीस तेव्हा देव काय म्हटला असेल? 

“माझं असं असतं तर…तसं असतं तर…या गोष्टींना काही आधार नसतो…वेळ कुणाच्या हातात नसते, आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं.. सगळं विधिलिखित असतं…

आज मी तुम्हाला बोललो, आणि इकडे आल्यावर जे वागलो ते नाटक होतं…

आईला जाणीव व्हावी म्हणून…

आई, देवाने आपल्याला खूप काही दिलंय..काहींना तर यातला 1 टक्काही मिळत नाही…

मग आपण देवाने दिलेल्या जीवनाचा असा उपहास केला तर तो त्याचा अपमान होईल.

हे जीवन आपल्याला मिळालेला प्रसाद आहे, तू असाच विचार करत राहिली तर तो देवाने दिलेल्या प्रसादाचा अपमान होईल…

आज मी हे सगळं बोललो तर तुम्हाला इतकं जिव्हारी लागलं..

पण आई, त्या विधात्याला तुझं बोलणं ऐकून काय वेदना होत असतील?

विचार कर…आणि समजून घे..!

ओम निघून जातो…

वडिलांना ओमच्या या वागण्याचा अभिमान वाटतो आणि त्याला मारल्याचा पाश्चात्तापही..

त्या दिवसानंतर तिच्या गोळ्या बंद झाल्या,

ती उत्साही राहू लागली..

जीवनावर प्रेम करू लागली..

आयुष्यात जे जे चांगलं घडलं त्याला देवाचा प्रसाद मानू लागली…

****

मैत्रिणींनो, 

आपणही बऱ्याचदा असले विचार मनात आणतो..

असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर..

पण एक लक्षात ठेवा..

आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा…

जे आहे त्याला देवाचा प्रसाद मानला तर आयुष्य सुखकर होईल…

जेव्हा जेव्हा तुम्ही जीवनाबद्दल तक्रार करता, 

तेव्हा तेव्हा देवाच्या दिलेल्या जीवनरूपी प्रसादाचा अपमान होतो…

मग आता प्रसाद हसत हसत स्वीकारायचा..

की त्याचा अपमान करायचा…

तुमच्या हातात…!!!

समाप्त

298 thoughts on “प्रसाद – 3 अंतिम”

  1. खूप छान विचार आहे. अर्थात इतक्या लवकर मन परिवर्तन घडून येत नाही, पण निदान आपली चूक लक्षात आली तर सुधारणा होईल अशी अपेक्षा तरी करता येईल.

    Reply
  2. खुप छान. Kharray आपण आपल्या कडे जे नाही त्याचा ch जास्त विचार करतो आणि जे आहे त्याला महत्व देत नाही

    Reply
  3. अगदी मनावर खोल रुतेल अशी शिकवण मिळते सर्वांना .जेवढे जवळ आहे तेही खूप अस वाटले तर मन उत्साही रहाते.उगीच तुलना त्रास देते

    Reply
  4. हृदयस्पर्शी कथा. प्रत्येकाला विचार करायला लावणारी आणि आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद मानन्या ऐवजी जे नाही त्यावर विचार करुन जीवन बेचव न करता आनंद घ्यायला हे शिकवणारी कथा

    Reply

Leave a Comment