दिव्याखाली अंधार

गगनबावड्याच्या आसपासच्या भागात साथीचा रोग आला होता. पटकीच्या साथीने गावेच्या गावे ओसाड झाली होती. कातळी गावच्या बाळा पाटलाच्या भावकीत ४ पोर मेल्याने तो चिंताग्रस्त होता. म्हातार्यांना मसणवट्यात पेटवायला लागणार्‍या सरपणाने निम्मी कुरणं रिकामी झाली होती. शेजारच सैतवडे गाव रिकाम पडल होतं. सैतवडे गावातली लोक गाव सोडून निघून जात होते कातळी गावात पारावर लोक जमा झाली. असलज गावाच्या पाटलानी गावातून मरीआयचा गाडा काढल्याची बातमी कातळीत पोहोचली. गावच्या म्हातारकोतार्यांनी गावातून मरीआयचा गाडा काढायच ठरवल. गगनबावड्याच्या गावागावांत मरिआईचा कोप होत असल्याची वार्ता वणव्यासारखी पसरली. असलज गावात पोतराज लखोबा देव्हारा घेउन फिरत होता. बाळा पाटलानी गावच्या जना लोहाराला वरच्या गावात लखबोला निरोप धाडायला पाठवल. जना बायका पोरांच बिर्हाड खेचराच्या पाठी टाकून त्याचा भाता घेउन मजल दरमजल करत बलुत्याच धान्य गोळा करत कातळी – सैतवडा-पळसंब फिरून असलजला पोहोचला.लखोबा असलजला पाल टाकून मुक्कामी होता. असलजच्या पाटलाच बोलवण होतं. त्याची बायको भागी बरोबर होती. नाव भाग्यश्री, पण जन्म महार घरी, पुर्ण आयुष्य पोतराजाबरोबरच्या अभाग्यात दिवस काढले होते. लखोबा – भागीला थोरली पोरगी होती, तिच नाव लक्ष्मी. लहान मुलगा ६ महिन्याचा होता. त्याच नावं दादा कोंडके या अभिनेत्यावरुन दादू ठेवल होतं. गावात आलेल्या पटकीच्या साथीने गावच्या गाव दु:खात असली तरी लखोबा खुष होता. पटकीला घाबरून मरीआईला मिळालेल्या बिदागीतुन त्याची बर्याच वर्षातुन पोटभर जेवण्याची चैन होत होती. जना लोहार त्याचा भाता घेउन असलजला उतरला. असलजच्या गावात येताच तो लखोबाच्या पालाकडे आला. लखोबाच्या दारात येताच त्यानी पाटलाचा निरोप दिला.

” लखोबा, तुला कातळीच्या बाळा पाटलाचा सांगोवा हाय.. गावात पटकीनी ज्याम केलय, म्हातारी थेरडी दिसना झालीत. पोरबाळं मरून पडलीत. मरीआईचा गाडा फिरवावं लागलं.. बग, दिडशे उंबरठ्याच गाव हाय.. बक्कळ बिदागी मिळतीया!”लखोबाच्या चेहर्‍यावर चकाकी आली..”व्हय की.. येतो की पाल घेउन आठ दिसात, सैतवड्याचा येढा उतरवला की पुढला मुक्काम कातळीलाच की” लखोबा उत्तरला.” अय्य लका मर्दांनो..सोडा ती पाटलाची म्हारकी,, पाटलाला खांदं नाईत का?? त्यो का देव्हारा उतलीत नाय” रामा भंगी बोलला.
“हे बघ राम्या, तू तुझ मेल्याली जनावरं येशीबाहेर ओढायचं काम सोडल, तू जात बाटली लेका..आम्हाला बाटवु नगं. आमचा पूर्वापार तोच धंदा हाये.. आमच्या बापजाद्यांनी बी भाकर खाल्ली.. आम्हीबी खाणार”लखोबा बोलला.
” नाय, त्ये आता चालायच न्हाय.. आता दलित पँथर हाये.. म्या सोडल काम.. आपण मेल्यालं जनवारं ओढायच.. म्हणजे गावचा रोग आपल्याला.. बाकी गाव रिकामा.. आपण राहाय गावाबाहेर.. काय गरज चाललीय लेकाहो.. गावाला हात नाहीत का? “रामू भंगी बोलला.” तस न्हाय राम्या.. महारा घरी गाणं, आणि कुणब्या घरी दाणं, हे सोडून कस चाललं.. चाल मोडलं की.. आन मी कडकलक्ष्मी झाल्यावर पाटलासहीत आख्खा गाव पाया पडतोय की.. ईतका मान हाय का कुठ..अमुशेला रोज पाटलाच्या घरी जेवाय जातोय.. त्यो मान नव्हं का? महाराच्या हातच्या किरसुणीला लक्ष्मी म्हणत नाहीत का?? “लखोबाने प्रतिप्रश्न केले.” ती मानापानाची नाटकं हायेती त्यांची.. का भटा बामनाच पोरं जनवारं ओढीत नाय.. पोतराज का महाराचच पोर होतय? महार का वेशीबाहेर राहतोय?” रामुच्या प्रश्नानी लखोबाचा चेहरा काळवंडला..रामराम ठोकून लखोबा हिरव्या पिवळ्या खणांचा घागरा घालून लक्ष्मीला सोबत घेउन निघाला. भागीच्या हातात ढोलकी होती. तर डोक्यावर मरीआईचा देव्हारा.. बारक्या लक्ष्मीच्या पाठीवर बांधलेल्या झोळीत बारका भाउ दादू रडत होता. पोतराज त्याचा आसूड घेत निघाला. असलज- पळसंब्या – सैतवड्यातुन तीन जीव चालत चालत कातळीला आले.

पोतराज त्याचा आसूड घेत निघाला. असलज- पळसंब्या – सैतवड्यातुन तीन जीव चालत चालत कातळीला आले.लखोबाला गावच्या सुतारानी नवीन गाडा करून दिला. त्यात मरीआई बसवली. दवंड्याने गावभर मरीआईचा गाडा फिरणार असल्याची दवंडी पिटवली. मरीआईचा गाडा निघाला. शाळेसमोरुन जाताना लखोबा स्वत :च्या पाठीवर जोरात फटके मारुन घेत होता. दर फटक्यानिशी गावची पोरं सर्कस चालल्यासारखी गर्दी करत होती. उन्हातान्हात लखोबा स्वत:वर फटके मारून घेत होता. देवी उगाच अंगात आणत होता.लोकांची गार्‍हाणी ऐकत होता. देवी तर्फे स्वतःच बोलत होता. लोक पाया पडत होती. देवीच्या शब्दाला मान देत होती. फटक्याच्या वाराबरोबर मिळणारी बिदागी त्याच्या फटक्याच्या जखमेला विसरायला त्याला भाग पाडत होती. गावचे लोक त्याच्या पाया पडत होते.डोक्यावर देव्हारा घेउन भागी तालात ढोलकी वाजवत होती. मरिआईचा गाडा गावातून गेल्यानंतर गावातून पटकीची साथ जाईल हि गावाची भाबडी समजूत होती. गाडा जाईल तसा समोर लोक नारळ फोडत होते. गाड्यापुढं आंबीलसडा घातला जात होता. अंडी फोडली जात होती.आलीया मरीआईतिनं गाड्याचा केला साजहाती कोरडा त्याला बाक,आलीया मरिबाई तिचा कळेना अनुभवुभल्याभल्यांचा घेती जीवूपोतराज वाजंत्र्यांबरोबर गात होता. लोक सुपातुन भागीच्या झोळीत धान्य टाकत होती. भागी डोक्यावर देव्हारा हातात मोरपिसांचा गुच्छा घेउन कडकलक्ष्मी अवतार घेतलेल्या नवर्‍याची साथ देत होती. लोक देव्हार्यावरुन लिंब ओवाळत होती. नारळ फोडत होती. गावात रयतच्या शाळेसमोरुन गाडा चालला होता. शाळेच्या भिंतीवर एका दाढीवाल्या बाबाच चित्र होतं.त्याच्या खांद्यावर काळी घोंगडी होती. दादुला पाठीवर बांधलेली लक्ष्मी एक एक चित्र बारकाईने न्याहाळत होती. शाळेच्या समोरच्या एका भिंतीवरील चित्रावर तिची नजर पडली. एक निळा कोट घातलेला बाबा, गोल चष्म्यातुन पाहात होता. छातीशी एक पुस्तक घट्ट पकडून तो रयतच्या शाळेकडे बोट करत होता.त्या कोटवाल्या बाबाच्या समोर काहीतरी वाक्य लिहीलेल होत.तिथ सुरपारंब्या खेळणाऱ्या एका मुलीला लक्ष्मीने थांबवत विचारल.. “बये, हे काय कि लिवलय?”

मुलीला वाचायला लागली – “शिका, संघटीत व्हा आणि संघ–” पूर्ण वाक्य वाचायच्या आधीच त्या मुलीच्या पाठीत तिच्या म्हातारीने जोरदार धपाटा दिला.”काय ग ए सटवे, महाराच्या पोरीला शिवती का?”म्हणत म्हातारीने मुलीला मारत मारत घरी नेलं.गाडा वाजंत्र्यांच्या वाजण्याबरोबर शाळेपुढ वाजत होता.भागीने पाहील की दादू बर्याच वेळापासुन रडला नव्हता.. तिच पूर्ण लक्ष आता देव्हार्यावर होत. लक्ष्मी पाठीवर फटके मारणर्या बापाला पाहात होती. तिच्या पाठीवरचा दादू बराच वेळ झोपला होता. बापाच्या फटक्याच्या पलीकडे ‘तो’ कोटवाला बाबा चष्म्यातून तिच्याकडे पाहताना तिला अजुनही अंधुक दिसत होता. त्याच्या हातातल पुस्तक का घट्ट धरल असावं त्यानं छातीशी?, तिला प्रश्न पडत होता.गावातून गाडा गेला. मरिआईचा शाप टळला म्हणून कातळी गाव खुष होत. बाळा पाटील गावाला शापातून वाचविल्याच्या अभिमानातुन मिशीवर ताव देत पारावर उभा होता. खेचरावर मिळालेल्या बिदागीच धान्य लखोबा बांधत होता. धान्याच्या ओझ्याने खेचर वाकला होता. लखोबा पोरबाळांसह लखमापुरला निघणार होता.सोबतचा दादू अजून उठला नाही म्हणुन भागीने पाहीलं आणि दिवसभर देवीचा देव्हारा मिरवणार्या भागीने एकच हंबरडा फोडला. पटकीने तिचा मुलगा घेतला होता. लखोबा धाय मोकलून रडत होता. लक्ष्मीला काय कराव सुचत नव्हत.तीच शरीर बधीर झाल होत.
गावातले लोक आ वासून पाहात होते. ईतक्यात गावातला कोणीतरी मरीआईने गावाच्या शापाबदल्यात पोतराजाचा मुलगा घेतला म्हणून हूल उठवली. गावातले लोक मरीआईला हात जोडत होते.
देव्हारा भागीच्या डोक्यावरून उतरला होता. गाडी गावाबाहेर पोहोचला होता. लक्ष्मीच या आरडोओरडीत लक्ष नव्हत. दादूला गावकुसाबाहेरच्या जमीनीत पोतराजाने दफनलं. ईतक्यात लखमापुरच्या पाटलाचा निरोप घेउन न्हावी आला होता. लागलीच लखमापुरला पोहोचावं, दोनशे उंबरठ्याच गाव हाये, म्हणुन न्हावी सांगत होता. पोतराज पुन्हा कडकलक्ष्मी अवतार घेउन तयार झाला होता. पण गावात दोन दिवस राहण्याशिवाय पर्याय नव्हता.लागलीच गावात बैठक बोलवली गेली. गावच्या बाळा पाटलानी पोतराजाच्या मेलेल्या पोराला संत घोषित केल. गावाने होकारार्थी मान डोलवली. संत दादा महाराजांच मंदीर गावात बांधण्याचा निर्णय एकमताने संमत झाला. गावच्या वेशीबाहेरुन हुंदके देत ह्या बातम्या लखोबा ऐकत होता. महामारीत लोभापायी गमावलेला लेक डोळ्यासमोर येत होता. लेकाच्या आठवणीत त्याचे डोळे लाल झाले होते. २ दिवसात पत्र्याच्या शेडच दादा महाराजांच मंदीर उभ राहील होत. लक्ष्मी मंदीरात जात असताना झाडुने फटकारत पुजार्‍याने तिला बाहेर हाकलल होत. मंदीरा बाहेर दानपेटी मांडण्यात आली होती. मंदीराच्या पक्क्या बांधकामाच्या निधीसाठी रक्कम पेटीत टाकण्याच आवाहन त्याद्वारे केल गेल होत. महीमा ऐकून दोन दिवसांत गावोगावचे भाविक जमा होता होते. मंदीरासमोर हार तुरे विकणारे, नारळ अगरबत्ती विकणर्यांनी दोन दिवसात बस्तान मांडल होत. गावाला जत्रेच स्वरूप रातोरात प्राप्त झाल होत.दोन तीन दिवस मुक्काम झाल्यानंतर लखोबा लखमापुरला निघाला. भागीच्या डोक्यावर पुन्हा देवीचा देव्हारा आराम करत होता. लक्ष्मी मात्र खेचरावर बसून चालली होती. तिच्या पाठीवर तिच्या भावाची झोळी नसून तिला जड जड वाटत होत. लखमापुरऐवजी वळुन परत आपल्या गावाला परतावं असा विचार बापासमोर मांडायची तिचा ईच्छा होती. पण लखोबाचा स्वभाव ती ओळखून होती. तिच्या चेहर्‍यासमोर अजुन तो कोटवाला बाबा आणि त्याच रयतच्या शाळेकडे केलेल बोट तिला दिसत होत.

6 thoughts on “दिव्याखाली अंधार”

  1. Hi there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my website to rank for some
    targeted keywords but I’m not seeing very good gains.

    If you know of any please share. Appreciate it!
    You can read similar blog here: Escape room

    Reply

Leave a Comment