अंदाज-3

 प्रयत्न करून करून कपभर चहा केला तरी वर काही उरायचाच..

हळूहळू,

स्वयंपाकाला लागली,

2 पोळ्यांचं कणिक, चार पोळ्यांचं व्हायचं,

एकाची भाजी, चार जणांची बनायची,

हात वळतच नव्हता, एकटीसाठी करायला..

जोपर्यंत जमायला लागलं,

तोवर वाटायला लागलं की काय हे, एवढंसं करण्यासाठी किती काम पुरतंय..

मग हळूहळू कंटाळा येऊ लागला,

बाहेरून मागव, कधी मॅगी खा..

तब्येतीवर परिणाम झाला,

एके दिवशी चक्कर येऊन पडली,

मोठ्या मुश्किलीने आईला फोन केला,

सांगितलं, एकासाठी करणं जड जातंय, म्हणून बाहेरचं खाल्लं..आणि एकाच्या जेवणाचा अंदाजच येत नाहीये, वाया जातं सगळं..काय करू मी?

आई म्हणाली,

“एकटीसाठी एकटीनेच आयुष्य जगायला गेलीस तर अंदाज चुकणारच… पदार्थांचे, अन…आयुष्याचे सुद्धा..”

तिच्या डोळ्यासमोरून भरभर जुने दिवस गेले,

चार ऐवजी सहा लोकांची भाजी टाकली जायची तिच्याकडून,

सासू तिला काही बोलू नये म्हणून दोन डिश जास्त खाऊन घेत,मला भाजी खूप आवडली म्हणत..

कधी दोन पोळ्या कमी झाल्या तर सासूबाईंना अंदाज येई,

छोट्या पातेल्यात भात लावून देत आणि स्वतः फक्त भात खात, आज पोटात दुखतंय म्हणून..

हसत खेळत ती स्वयंपाक करे आणि सर्वजण आनंदाने खात,

नंतर स्वावलंबनाचं काहीतरी तिच्या डोक्यात घुसलं, आयुष्यभर यांना जेवणच घालू का असे विचार येऊ लागले,

तरी घरचे म्हणाले, सुनबाई..तुला हवं ते कर..

तिने नोकरी मिळवली, पण दुर्दैवाने सासूबाईंचा पाय मोडला,

सासुबाई म्हणायच्या, सुनबाई तू माझ्यासाठी थांबू नकोस..

पण थांबले नाही तर मी वाईट ठरणार..

सासूबाईंनी मुद्दामच पाय मोडून घेतला असा तिचा गैरसमज,

त्यात सासरेबुवांना दगदग सहन होईना, त्यांनाही bp मुळे चक्कर येऊ लागली,

त्यांची वयं वाढत होती,

सूनबाईला वाटे मला मुद्दाम घरी बसवण्यासाठी चाललंय,

ती बिथरली,

प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं,

पण पातेल्यातला उरलेला चहा,

जास्तीच्या पोळ्या,

आणि उरलेली भाजी,

आज तिला सकारात्मक बाजू दाखवून गेल्या,

आज तिच्याकडे सगळं काही होतं,

पण सगळं गमावल्यासारखं होतं, 

सहन झालं नाही,

एकदा घराकडे जाऊन यावं, मन भरून आलं,

असह्य झालं,

बॅग भरली आणि निघाली,

दुपारी सर्वजण झोपतात, तिला माहीत होतं,

हळूच गेटचं दार उघडलं,

किचनच्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं,

सासुबाई उरलेली मोठी रस्साभाजी कढईतून पातेल्यात ओतत होत्या,

सासरेबुवा मागून हळूच म्हणाले,

काहीही म्हण, सूनबाईचा अंदाज चुकत नसायचा..

सासूबाईंनी डोळ्याला हळूच पदर लावला,

“हे खोटं आहे बाबा, खूप अंदाज चुकलेत माझे..अगदी आयुष्यभर पश्चात्ताप देतील इतके चुकलेत…”

आवाज ऐकून दोघे इकडेतिकडे पाहू लागले, चटकन बाहेर आले..

सुनबाई दारात उभी,

तिघांच्या पाणावलेल्या नजराच एकमेकांशी बोलत होत्या,

धीर एकटवून तिने विचारलं…

“पुन्हा पदरात घ्याल?”

समाप्त

4 thoughts on “अंदाज-3”

  1. खरंच सर्व जन आपल्या मनाप्रमाणे वागत राहिले तर आपली मानस कोठे जाणार थोड जुन्या लोकाचे विचार वेगळे असतात तेना आपण केलेल्या कटाने मिळवलेल कधीच वाया जाउदेयाचे नसते कारण ते बोलतात मानसाने खाउण मस्ती ला यायचे टाकुन नाही पण आज कालची पिडी तेचा विचार करत नाही तेना वाटते आपल्या मनाप्रमाणे सगळं झाले पाहिजे जुण्या मानसाचे विचार नवीन पिढीला पटत नाहीत पण खरं सागायचे तर जुन्या लोकाणी जे करुन ठेवले आहे ते आताच्या पिडीला कधीच जमणार नाही

    Reply
  2. आज पण ते सत्य आहे आता प्रगती मुळे जमीन कमी झाली काही शतकांनी म्हंन्या पेक्षा काही दशकांनी अन्न मिळणार नाही

    Reply

Leave a Comment